सुमित दंडुके / औरंगाबाद : नगर-औरंगाबाद महामार्गावरील देवगड फाट्याजवळ कार आणि खासगी बसच्या अपघातात पाच जण ठार झाले. हा अपघात आज पहाटे दोनच्या सुमारास झाला. कारमधील मृत जालना जिल्ह्यातील आहेत.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, स्वीफ्ट कार (क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) औरंगाबादहून नगरकडे जात असताना देवगड फाट्याजवळ खासगी ट्रॅव्हल बसशी (एमएच १९ वाय ७१२३) तिची धडक झाली. कार व बस दोन्ही वेगात असल्याने ही धडक जोरदार झाली. या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले. ते सर्वजण जालना जिल्ह्यातील असल्याचे समजते आहे. अपघातात कार बसच्या समोरील बाजूने घुसल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली. पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वाहतूक तुरळक होती. या अपघाताची माहिती मिळताच नेवासाचे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी आपले सहकारी पोलिस कर्मचारी अशोक नागरगोजे, बबन तमनर, दिलीप कुऱ्हाडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.