विजय कुलकर्णी/सेलु : तालुक्यातील ५ महसूल मंडळ विभागांपैकी केवळ सेलू, कुपटा, चिकलठाणा, देऊळगाव गात या चार महसूल मंडळातच खरीप हंगाम काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई अनुदान जाहीर झाले आहे. परंतु वालुर महसूल मंडळातील २१ गावांना या अनुदान प्रक्रियेतून वगळल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले असून तातडीने या गावांना अनुदान जाहीर करण्याची मागणी सेलू दबाव गटाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली.
वालुर महसूल विभागातील गावे ही प्रामुख्याने दुधना नदीच्या किनाऱ्यालगत असून या महसूल मंडळात ऑक्टोबर महिन्यापर्यंत अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत या विभागातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी नुकसानीबाबतचे पंचनामे देखील केले आहेत. तसेच यावर्षी झालेला सततचा पाऊस व लोअर दुधना धरणातून पाऊस सुरू असताना दुधना नदीपात्रात दोनवेळा पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याने नदीकाठच्या नाले, ओढे यामध्ये तसेच अतिवृष्टीने झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी शेतीमध्ये साचून वालुर मंडळातील २१ गावांमधील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. याची माहिती व जाणीव तहसीलदार व कृषी अधिकारी यांना असतानाही त्यांनी या नुकसानीकडे दुर्लक्ष करून या भागात अतिवृष्टी झालेली नाही अशी चुकीची माहिती शासनाकडे पाठविल्याचे कळते. त्यामुळे वालुर महसूल मंडळातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने व नदी नाल्याचे पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान होऊन देखील केवळ चुकीच्या तांत्रिक माहितीच्या आधारे या मंडळातील २१ गावांना अतिवृष्टीचे अनुदान मिळू शकले नाही ही बाब वालुर मंडळातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारी आहे.
तालुक्यातील केवळ ९४ गावांपैकी ७३ गावे मदतीच्या निकषात बसल्याचे महसुल प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.परंतु वालुर मंडळातील २१ गावांना जाणीवपूर्वक वगळले असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत. यामुळे तातडीने या २१ गावांनाही शासनाने जाहीर केले प्रतिहेक्टरी १० हजार रु.प्रमाणे अनुदान द्यावे अन्यथा दि.१६ फेब्रुवारी पासून साखळी पद्धतीने उपोषण करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
या निवेदनावर दबाव गटाचे निमंत्रक अॅड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, सतीश काकडे, जयसिंग शेळके, दत्तराव आंधळे, अॅड.देवराव दळवे, सय्यद जलाल, विलास रोडगे, योगेश काकडे, मधुकर सोळंके, लक्ष्मण प्रधान, रामचंद्र कांबळे, गुलाबराव पौळ, दिलीप शेवाळे, मुकुंद टेकाळे, केशव डोईफोडे, रामप्रसाद शिंदे, इसाक पटेल, अॕड. योगेश सूर्यवंशी आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.