औरंगाबादः शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव, शास्त्रज्ञ डॉ मानवेंद्र सखाराम काचोळे यांचे आज सायंकाळी निधन झाले. त्यांनी वयाच्या ६८ वर्षी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, यातच त्यांची प्राणज्योत मालवली.मे २०१४ मध्ये ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जिवरसायनशास्त्र विभागप्रमुख,प्राध्यापक यापदावरून सेवानिवृत्त झाले.२००९-१० या काळात ते कुलसचिव तसेच २००६ ते २०१० काळात ते विभागप्रमुख व्यवस्थापन परिषद सदस्य होते.
शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी अखेरपर्यंत काम केले. सध्या ते शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीवर कार्यरत होते.स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. याच पक्षाच्या वतीने २००४ मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. सध्या एमजीएम विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी जिल्ह्यामध्ये ते संशोधक संचालक म्हणून कार्यरत होते. जवखेडा तालुका कन्नड येथील मूळ रहिवासी असलेले डॉ काचोळे हे सध्या खोकडपुरा येथे स्थायिक झाले होते.काचोळे यांनी २००९ मध्ये परभणी मतदार संघातून निवडणूक लढवली होती. तसेच स्वतंत्र भारत पक्षाचे त्यांनी अध्यक्षपदही त्यांनी भुषवले होते.