विजय कुलकर्णी/ परभणी : ग्रामीण भागात उघड्यावर असणारी हागणदारी म्हणजे मानवाला लागलेला कलंक आहे. तो पुसून काढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या व गावाच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करण्याचे आवाहन जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी केले आहे. आज सेलू तालुक्यातील निपाणी टाकळी या ग्रामपंचायतीत 'माझा गाव सुंदर गाव' उपक्रमांतर्गत गावातील नागरिकांशी प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छता या विषयावर त्यांनी संवाद साधला.
यावेळी पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, गट विकास अधिकारी विष्णू मोरे, गटशिक्षणाधिकारी गणराज यरमाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सोनवणे, सहाय्यक गटविकास अधिकारी डी. एस. अहिरे, सरपंच सपना सावंत, उपसरपंच लहानाप्पा हारकळ, माजी सरपंच प्रकाश मुळे, दिगंबर गिराम, ग्राम विकास अधिकारी जयराम नटवे, सीडीपीओ कच्छवे, संवाद तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड, स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी व ग्रामस्थांची मोठया संख्येने उपस्थिती होती. पुढे बोलताना टाकसाळे म्हणाले की, गाव स्वच्छतेत युवकांनी पुढाकार घ्यावा म्हणजे गावे स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही तसेच शिक्षक, ग्रामसेवक आणि अंगणवाडीताई यांनी शौचालयाचा नियमित वापर करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, प्लास्टिकच्या अतिवापरामुळे गावातील नाल्या तुंबतात, दूषित पाण्यामुळे आणि डासांमुळे डेंग्यू, कॉलरा, हत्तीरोग, टॉयफाईड सारखे आजार बळावतात म्हणून प्लास्टिक आणि अस्वच्छतेला हद्दपार केले पाहिजे, सांडपाण्यासाठी लोकसहभागातून शोषखड्डे करावेत आणि पाण्याची साठवणूक केली पाहिजे, मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे, मोबाईल, टीव्ही, मोटायसायकल यापेक्षा स्त्रियांच्या सन्मानासाठी शौचालय किती महत्त्वाचे आहे, पशु पक्ष्यांसाठी पाणवठे तयार करणे अशा विविध विषयांवर टाकसाळे यांनी ग्रामीण भाषा शैलीतून नागरिकांशी संवाद साधला.