विजय कुलकर्णी/ परभणी : माझी वसुंधरा अभियानाच्या निमित्ताने आज सकाळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी सायकलवर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले.
या अभियानाअंतर्गत दर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयसह अन्य विभागातील अधिकारी-कर्मचारी सायकलवरुन कार्यालयात येणार आहेत. राज्यशासनाने पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता 'माझी वसुंधरा अभियान' राबवले आहे. राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांनी शासकीय कार्यालयात ये-जा करण्यासाठी वाहनाऐवजी पायी, सायकल वा सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करावा. तसेच कोणत्याही परिस्थितीत खासगी वाहनाचा वापर कटाक्षाने टाळावा. जेणे करून वायुप्रदूषण कमी होण्यास मदत होईल. व हवेच्या गुणवत्तेतही सुधारणा व्हावी, हाच या मागचा उद्देश असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यामुळेच आता यापुढे दर मंगळवारी जिल्हाधिका-यांसह अन्य अधिकारी-कर्मचारी वाहनांऐवजी सायकलने कार्यालयात दाखल होणार आहेत.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी 'माझी वसुंधरा' अभियान प्रभावीपणे राबवून परभणी जिल्ह्यास पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीत अग्रभागी ठेवावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.