नवी दिल्लीः गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. ते आता २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. त्याविरोधात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र ही रॅली रोखण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत आम्ही कोणताही आदेश देणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
मोर्चामुळे प्रजासत्ताक दिनाचे मेळावे किंवा समारंभामध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे ट्रॅक्टर मोर्चा किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या आंदोलनाला मनाई करावी, असा अर्ज केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. त्यावर सुनावणी घेताना सर न्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मोर्चाला राजधानीत प्रवेश देण्याबाबतचा मुद्दा प्रथम दिल्ली पोलिसांच्या अधिकारकक्षेत येतो असे स्पष्ट केले आहे.
सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु होती. केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन सुरु असताना मोर्चा न काढण्याचा आदेश शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. न्यायालयाने केंद्राला याचिका मागे घेण्याची परवानगी दिली असून दिल्ली पोलिसांना निर्णय घेण्यास सांगितले आहे.