मुंबईः वर्षभरापासून कोरोनामुळे अनेक सण, महोत्सव, लग्न समारंभ, यात्रा, बाजार यांसह अनेक गर्दी जमवणाऱ्या ठिकाणांवर निर्बंध लावण्यात आलेे होते. त्यात सरकारने हळूहळू शिथिलता आणत निर्बंध कमी केले. येत्या १९ फेब्रुवारी रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंती निमीत्त सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करत गृह विभागाकडून परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकात १० जणांच्या उपस्थितीत शिवजंयती साजरी करावी असे परिपत्रक काढण्यात आले होते. सरकारच्या या चुकीमुळे शिवप्रेमी यांनी यांच्यावर टिका केली होती. मात्र पुन्हा चूक सुधारत गृह विभागाकडून दुसरे शुद्धपरिपत्रक काढण्यात आले. यात शासन परिपत्रक ११ फेब्रुवारी २०२१ मधील मुद्दा ३ मधील ओळ क्रमांक ४ मध्ये सुधारणा करत १० ऐवजी १०० असे वाचावे, असे स्पष्टीकरण देण्यात आले. १०० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी असे सरकारने जारी केले आहे.

-
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९फेब्रुवारी, १६३० रोजी शिवनेरीवर झाला होता. त्यामुळे अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.
-
दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
-
तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.
-
शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात याचे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
-
आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,
-
Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.