विजय कुलकर्णीः परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती, पंचायत समिती, कार्यालये या ठिकाणी प्लास्टिक कचरा वेचण्याची व्यापक मोहीम दि.२१ जानेवारीपासुन हाती घेण्यात आली असून २६ जानेवारीपर्यंत ही मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पाणी व स्वच्छता कक्षाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड आदींची उपस्थिती होती.प्लास्टिक आणि अविघनटनशील कचरा उघड्यावर टाकल्याने व घनकचरा विल्हेवाटीच्या ठिकाणी जाळल्याने मानव, निसर्ग आणि प्राण्यांना त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. परभणी जिल्हाभर स्वच्छता आणि प्लास्टीक मुक्तीची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत सर्व विभाग, पंचायत समिती, ग्रामपंचायती, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्रांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचारी, यंत्रणेच्या मदतीने ही प्लास्टीक कचरा गोळा करण्याची मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.ग्रामपंचायत स्तरावर आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, स्वच्छाग्रही, जलसुरक्षक, पाणी पुरवठा कर्मचारी यासारख्या आदी कर्मचार्यांचे सहकार्य घ्यावे, असेही कळविण्यात आले आहे.
या मोहिमेसाठी पालक अधिकार्यांची नेमूणक करण्यात आली आहे. यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) मंजुषा कापसे यांची परभणी तालुक्यासाठी पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता गंगाधर यंबडवार, बांधकाम उपअभियंता डी.एस.उडाणशिवे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, महिला व बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, गटविकास अधिकारी जयंत गाडे, समाज कल्याण अधिकारी सचिन कवले यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.या मोहिमेतून गोळा झालेला प्लास्टिक कचरा एकत्र करुन महानगरपालिका, नगर परिषदांच्या सहकार्याने नंतर विघटनाची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही टाकसाळे यांनी सांगितले.