परभणी : केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्याची कामे तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी संबंधित कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून शेतकऱ्यांना नैसर्गिक खताचा वापर करता येतो, इंधनाची निर्मिती होते, बायोगॅस मधील स्लरीचा खत म्हणून वापर करता येतो तसेच हा प्रकल्प तयार करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. असे अनेक फायदे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्पामधून मिळतात.
आज मानवत तालुक्यातील ताडबोरगाव या ग्रामपंचायतीमध्ये मुख्य सीईओ टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बायोगॅस प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील तीन शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्पाचे मार्क आऊट कृषी विस्तार अधिकारी वसंत ईखे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
यावेळी सरपंच नीता काजळे, उपसरपंच उमर खान पठाण, ग्रामसेविका मनीषा लोमटे, माऊली काजळे, सचिन पठाडे, स्वच्छ भारत मिशन कक्षातील परमेश्वर हलगे, ज्ञानेश्वर गायकवाड, अविनाश आरळकर, गणेश हरकळ, अशोक भोकरे आदींची उपस्थिती होती.