सोनपेठ : काही दिवसांपूर्वी विज तोडल्यानंतर विजेच्या खांबावर चढुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या आत्म्याला शांती लाभावी व सरकारला सुद्बुद्धी लाभो यासाठी वीज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन दि.२६ रोजी आत्मक्लेष करणार असल्याचे शेतकरी संघटनेचे गणेश पाटील यांनी सांगितले आहे.
थकीत विज बिलाच्या वसुलीसाठी राज्य शासनाने विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर टाकलेल्या दबावामुळे कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांची वीज तोडत आहेत. शेतीमध्ये पिके उभी असुन वीज तोडणीच्या सुलतानी संकटामुळे शेतकरी प्रचंड दबावाखाली आले आहेत. या दबावामुळे शेतकरी आत्महत्या सारखे गंभीर मार्ग अवलंबत आहे. पंजाब व हरियाणाच्या शेतकऱ्यांना पाठींबा देणारे राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीत वीज बिल बसुलीचा खंजीर खुपसत आहे.
या वसुलीसाठी वीज तोडल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने वीजेच्या खांबावर चढुन आपला जीव दिला. राज्यातील शेतकरी हे सक्तीच्या वसुलीमुळे प्रचंड नैराश्यात आहेत. राज्य सरकारच्या या सक्तीच्या विज बिल वसुलीच्या धोरणाच्या निषेधार्थ तसेच मृत पावलेल्या शेतक-यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व सरकारला सुद्बुद्धी मिळण्यासाठी दि.२६ रोजी विज वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर समोर बसुन शेतकरी आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार सोनपेठ यांना देण्यात आले. या वेळी शेतकरी संघटनेचे गणेश पाटील,सुधीर बिंदू ,विश्वंभर गोरवे,माऊली जोगदंड,गणेश पतंगे यांची उपस्थिती होती.