स्वप्नील कुमावत/मुंबई : गिरीश महाजन यांच्याविरोधात जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संचालकांना डांबून ठेवून मारहाण केल्याचा आणि त्यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. तीन वर्षांमध्ये अॅड. विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा वाटला नाही. ते स्वत: मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.
याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. त्यापुर्वी महाजन यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून महाजन यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा गुन्हा कुठे घडला? कधी घडला? ज्यांना मारहाण करण्यात आली ते लोक त्यावेळी कुठे होते? त्यांचे फोन ट्रॅक करा, अशी मागणी गिरीश महाजन यांनी कोर्टाकडे केली आहे.

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ ही मराठा समाजाची संस्था आहे. ती केवळ मराठा समाजापूरतीच मर्यादित आहे. या संस्थेच्या कार्यकारिणीवर इतर समाजाचे लोक येऊ शकत नाहीत, असं त्यांच्या बायलॉजमध्येच नमूद करण्यात आलेलं आहे. मी ओबीसी असून माझे इतर सहकारी वेगवेगळ्या समाजातील आहेत. मग ते या संस्थेचे सदस्य कसे होतील? आम्ही ही संस्था बळकावण्याचा प्रयत्न केला असे कसे म्हणता येईल? असे सवाल करतानाच या मागे बोलवता धनी कोण आहे, हे सर्वांनाच माहीत असून हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा दावाही महाजनांनी केला.