विजय कुलकर्णी/परभणी : आपल्या देशातील समाजाची पराभूत मनोवृत्ती बदलायची असेल तर संपन्न भूतकाळाचा मागोवा घ्यावा लागेल. दोन हजार वर्षांखालील शिल्पाविष्कार आपल्या संपन्न इतिहासाचा साक्षीदार आहे. त्याचे संगोपन करण्याचे आवाहन इतिहासतज्ज्ञ डॉ.प्रभाकर देव यांनी केले.'महाराष्ट्रातील शिल्पवैभव' या विषयावर गणेश वाचनालयाच्या वतीने आयोजित कै.मुकूंदराव पेडगावकर स्मृती व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी गेवराई तालुक्यातील पाठसरा येथे अनाथ आश्रम चालवणा-या संतोष गर्जे यांना लोपामुद्रा पुरस्कार प्रदान करत सपत्निक गौरव करण्यात आला. पुढे बोलताना डॉ.देव म्हणाले,वेरूळ अजिंठा येथील लेण्यांखेरीज महाराष्ट्रात राष्ट्रकुट, सातवाहन,चालूक्य व यादवांच्या काळातील पुरातन मंदिेरे आहेत. मराठवाडयात तर त्याची संख्या शेकड्यात आहे. या प्रदेशाच्या संपन्नतेचे प्रतिक असणारी अनेक मंदिरं उध्वस्त अवस्थेत शेवटचे श्वास मोजीत आहेत.
ही मंदिरं आमच्या समृध्द शिल्पाविष्काराचे पुरावे आहेत.देवळांकडे धर्मस्थळं म्हणून पाहू नका.ती कला व समाजकेंद्र होती.आमच्या शिल्पकारांनी दगडात जीव ओतून स्वान्त सुखाय,समष्टीच्या रूपात केलेला हा शिल्पाविष्कार आपल्या समाज जीवनाचे दर्शन आहे.पुर्वजांच्या कलेचा आदर, संगोपन करणे आपले कर्तव्य नव्हे काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला. परधर्मियांनी आमची अस्मिता असणाऱ्या मंदिरांची नासधूस केली म्हणून आपण ओरड करतो. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आपण आपल्या मंदिर व शिल्पांना कितपत न्याय दिला? याचा विचार करावा असेही ते म्हणाले.आपली धरोहर आपणच जपली पाहिजे हा संस्कार आपला समाज विसरत चाललेला आहे. याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी संतोष गर्जे यांनीही सत्काराला ऊत्तर देत या "लोपामुद्रा" पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.