श्वेता भेंडारकर/मुंबईः महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुजराती लोकांसाठी,'मुंबई मां जलेबी ने फाफडा;उद्धव ठाकरे आपडा, अशी टॅगलाइन देत. गुजराती भाषिकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्यावर भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी खोचक ट्वीट करत, 'शिवसेनेने साद घातली असली तरी गुजराती मतदाराने मनाशी पक्के ठरवले आहे. 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, जनाबसेनेला आपटा', असे भातखळकर यांनी म्हटले होते. हेमराज शाह यांनी भातखळकरांच्या या टीकेचा समाचार घेत, गुजराती माणसाने उद्धव ठाकरे यांना 'आपडा' म्हटल्यावर भाजपच्या अतुल भातखळकर यांचा तीळपापड का झाला? कालपासून ते खळ खळ का करत आहेत? अतुल भातखळकर नेमके कोणाचे आहेत? भाजपला मत देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे? असा खडा सवाल शिवसेनेचे संघटक हेमराज शाह यांनी केला आहे.
भातखळकरांच्या पक्षाची अवस्था सध्या घर का ना घाट का, अशी झाली आहे. बाबरी यांनी नाही पाडली, राममंदिराचा निर्णय यांनी नाही घेतला, पैसा जनतेचा वापरणार, मग श्रेय कसले?, असा सवाल देशाची जनता तुम्हाला विचारतेय. देशभरातील गुजराती आणि हिंदूंनी मिळून रामजन्मभूमी आंदोलन पेटवले होते हे तुम्ही कसे विसरलात? त्याची फळे आज भलतेच कोणी चाखत आहे. भाजपचे नेते अस्वस्थ आहेत. मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपमध्ये त्रस्त आहेत. गुजराती माणूस स्वाभिमानी आहे, भाजपने त्याला स्वतःची जागीर समजू नये असा इशाराही शाह यांनी दिला आहे.