इराणममध्ये अडकलेले 10,000 भारतीय मायदेशी परतणार; केंद्र सरकार अशी करतंय तयारी

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत. हे दोन्ही देश एकमेकांना सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. या युद्धामुळे तब्बल 10,000 भारतीय नागरीक इराणमध्ये अडकले आहेत. त्यात 6,000 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आता या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे.

भारतातून अनेक विद्यार्थी इराणमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. सध्या इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान तब्बल 6,000 विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. या देशाची विमानसेवा बंद असली तरी जमिनीवरील सीमा खुल्या आहेत. या विद्यार्थ्यांना आता आर्मेनियामार्गे भारतात आणलं जाईल.  इराणच्या विविध शहरातून 110 भारतीय विद्यार्थी सोमवारी रात्री आर्मेनियाच्या सीमेवर दाखल झाले. आता त्यांना लवकरात लवकर हवाई मार्गाद्वारे मायदेशी परत आणलं जाईल. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आर्मेनियाचे समकक्ष अरत मिरझोयान यांच्याशी चर्चा केली. भारतीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी आर्मेनिया योग्य पर्याय असल्याचं बोललं जातंय. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या देखरेखीखाली भारतीयांना इराणमधील सुरक्षित ठिकाणी हलवलं जात आहे. हे नागरिक लवकरच सुरक्षित भारतात परततील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Iran- Israel War

इराणमध्ये असलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांनी तेथील परिस्थिती स्पष्ट केली आहे. या विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर पडण्याची परवानगी नाही. तसंच रेशन पुरवलं जात नसल्यानं त्यांना दिवसातून एकच वेळ जेवण मिळत आहे. तर अंधार पडताच वीजपुरवठा खंडीत होतो. तसंच रात्री स्फोटांच्या आवाजामुळे झोपही नीट होत नाही. त्यासोबतच इंटरनेट सेवा देखील मंद आहे, तर इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप देखील बंद असल्याची माहिती भारतीय विद्यार्थ्यांनी दिली आहे.

आर्मेनियाच का?
भारताने नागरीकांना परत आणण्यासाठी आर्मेनियाचीच निवड केली यामागे काही कारणं आहेत. इराणची सीमा 7 देशांशी लागून आहे. हे देश म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, आर्मेनिया, तुर्की आणि इराक. त्यात भारताचे आर्मेनियाशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यासोबतच दोन्ही देशांमध्ये संरक्षण करारही झाले आहेत. तसंच इराण आणि आर्मेनियामध्ये सध्या कोणताही सीमा वाद किंवा लष्करी तणाव नाही. म्हणूनच भारताने या देशाची निवड केली आहे.

Share