हिंदीविरोधात ठाकरे बंधू एकत्र; ‘या’ दिवशी निघणार मोर्चा; भाजपची भूमिका काय?

राज्याच्या राजकारणात सध्या हिंदी भाषासक्तीचा मुद्दा चांगलाच तापलाय. त्रिभाषा सुत्रीचा अवलंब करत राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच तीन भाषा शिकवण्याचा निर्णय सरकारनं घेतला. या धोरणाला आता विरोधी पक्ष कडाडून विरोध करताना दिसतायत. त्रिभाषा सुत्री म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदीची सक्ती केली जात असल्याचा दावा विरोधक करतायत. तर विद्यार्थ्यांच्या बहुभाषिक विकासासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्टिकरण सरकारनं दिलंय. तसंच हिंदी सक्ती केली नसुन ती पर्यायी भाषा केली असून प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी शिकणं बंधनकारक आहे असं देखील सरकारने म्हटलं आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू एकत्र मैदानात उतरलेत.

राज्य सरकारच्या हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात मुंबईत येत्या 5 जुलै रोजी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान या मार्गावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. ‘या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल तर केवळ मराठीचा अजेंडा असेल. मराठीवर महाराष्ट्रावर प्रेम करणा-या सगळयांनी या मोर्चात सहभागी व्हावे. तसंच सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केले होते. तर, 6 जुलै रोजी मुंबईत मराठी माणसांचा मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरेंनी केली. दरम्यान, या आंदोलनात शिवसेना उबाठाने सहभागी होण्याकरिता मी उद्धव ठाकरेंशी बोलणार असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. त्यानंतर आज ठाकरे बंधू मोर्चासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर संजय राऊत यांनी शिक्कामोर्तब केला आहे. 5 जुलै रोजी काढण्यात येणार्या या मोर्चात ठाकरे बंधू एकत्र सहभागी होणार आहेत. संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंचा एक एकत्र फोटो शेअर करत एकच मोर्चा निघणार असल्याची घोषणा केली आहे.

राज ठाकरे यांनी आधी 6 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. तर उबाठा शिवसेनेचा मोर्चा 7 जुलै रोजी होणार होता. पण राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे बंधूंची चर्चा झाली आणि एकत्र मोर्चा काढण्याचं निश्चित केलं. आता 5 जुलै रोजी हा मोर्चा निघणार आहे. अशी माहीती संजय राऊत यांनी दिली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ठाकरे बंधूचा हा मोर्चा भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतो. आता या आंदोलनाला भाजप नेमकं कसं उत्तर देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Share