माझे कुटुंब माझी जबाबदारी, उद्धव ठाकरेंना परिवाराशिवाय कोणीच दिसत नाही – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : माझे कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भिती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भिती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत, अशा शब्दांत बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही, असेही ते म्हणाले.

आज वशंवादावरून माझ्यावर टीका केली जात आहे. माझ्या घराण्यावर, वंशावर टीका होत आहे. मला माझ्या वंशाचा अभिमानच आहे. घराण्याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यावेळी तुमचे योगदान काय? संयुक्त महाराष्ट्र समिती फोडणारे हे जनसंघच. मात्र, तुमच्या वंशावरूनच वाद आहे. भाजपने पक्षात बाहेरचे इतके उपरे भरून ठेवले आहेत की, आता तुमचा वंश बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही? अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती.

Share