भाषिक आणिबाणी स्वीकारणार नाही; हिंदीविरोधात राज ठाकरेंची मोठी घोषणा

महाराष्ट्रात सरकारने नव्या शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सुत्री लागू करण्याच्या निर्णयाला सध्या विरोधी पक्षाकडून कडाडून विरोध होत आहे. याच प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाला थेट विरोध करत राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणत अप्रत्यक्षपणे हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. त्यानंतर राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. मात्र, राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर कायम आहेत. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.

राज ठाकरेंनी आम्हाला शासनाची भूमिका अजिबात मान्य नाही. सरकारने पटवून देण्याचा विषयच येत नाही, आम्हाला भूमिका मान्य नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तसेच, सरकारच्या या निर्णयाविरुद्ध सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहनही राज ठाकरेंनी केले आहे. तर, 6 जुलै रोजी मुंबईत मराठी माणसांचा मोर्चा काढणार असल्याची घोषणाही राज ठाकरेंनी केली.

राज ठाकरेंनी 6 जुलै सकाळी 10 वाजता हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावेळी रविवारीच या मोर्चाचे आयोजन केले असून जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. यावेळी ते म्हणाले, ‘आम्ही शिक्षणतज्ञ, साहित्यिक आणि इतर सर्वांशी बोलणार आहोत. सर्व पालक, विद्यार्थी यांना आम्ही निमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय आहे ते…’ अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली आहे. तसंच, भुसेंना मला भेटायचे असेल तर आझाद मैदानात भेटावे हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी, असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आता येऊन गेले त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मी पूर्णपणे भूमिका फेटाळून लावली असून आम्हाला हे मान्य नसल्याचे सांगितले. खरतर 5 वी नंतरच पर्यायी भाषेचा मुद्दा आहे, त्यांना हेही सांगितले की NEP मध्ये असे काही नाही हे राज्यांवर टाकले आहे, मग ते का करत नाहीत, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. तर, सीबीएसई या शाळा आल्या त्या आयएएस अधिकाऱ्यांसाठी काढण्यात आल्या आहेत. त्या शाळेच वर्चस्व करण्याचे सुरू आहे आणि महाराष्ट्र हे का करत आहे? बाकी राज्य काही अशी भूमिका घेत नाही. आमचा या संपूर्ण प्रकरणाला विरोध आहे, असेल आणि राहणार अशी भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे.

Share