विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – खा.बाळू धानोरकर

चंद्रपूर : विदर्भात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली असून अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. मनुष्यहानी व पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस आल्याने यासह विदर्भातील अन्य जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची लोकहितकारी मागणी महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील १३ हजार २३९ हेक्टर शेत जमीन पाण्याखाली अथवा वाहून गेली असून २०१५ चा याबाबत जो शासन निर्णय आहे. त्यानुसार केवळ ३४ हजार प्रति हेक्टर मदतीची तरतूद आहे. या निर्णयाला ७ वर्षे लोटून गेल्याने यात भर घालून हेक्टरी ६० हजाराची मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी पत्राच्या माध्यमातून खासदार बाळू धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

शेतकऱ्याने शेतात पिकांची लागवड केली होती. परंतु या पावसामुळे त्यांचे पीक वाहून गेले. आता त्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. शेतीच्या नुकसानीसोबतच हजारो घरांची पडझड तसेच मनुष्यहानी व पशुधन हानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. प्रभावित क्षेत्रांमध्ये अद्यापही विद्युत पुरवठा खंडित आहे. या सर्वांवर प्रभावीपणे मदत शासनाने मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Share