हिंदूत्ववादी सरकारच्या राज्यात हिंदू शेतकरी वाऱ्यावर; पटोलेंची टीका

मुंबई : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे. ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूचे सरकार आले असून सण, उत्सव, आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित असल्याची टिका काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सध्याचे सरकार हे केवळ इव्हेंटबाज आहे. या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. आजही पंचनामेच सुरु आहेत. शेतकऱ्यंबद्दल कळवळा दाखवण्यासाठी भाजपच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यवतमाळच्या एका गावातील शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम केला. पण नंतर त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केली. आजही कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला पण तो केवळ इव्हेंट आहे. अशा इव्हेंटमधून शेतकऱ्यांच्या समस्या दुर होणार नसल्याचे त्यांनी म्हटले. कृषी मंत्री हा शेती व शेतकऱ्यांची जाण असणारा असायला हवा पण सध्याच्या कृषीमंत्र्याबाबत तसे नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख काय कळणार? असा सवाल ही नाना पटोले यांनी केला. एखादा इव्हेंट करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असा त्यांचा दावा असेल तर तो साफ चुकीचा असल्याचेही त्यांनी म्हटले.

काळा पैसा भाजपकडे कुठून येतो?

भाजप विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी काळ्या पैशाचा वापर करत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ३५०० कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. बंडखोरी केलेल्या काही आमदारांनी ५० कोटींची ऑफर असल्याचे सांगितले होते. हा काळा पैसा भाजपाकडे कुठून येतो? याची सीबीआय, ईडीने चौकशी केली पाहिजे. तसेच राज्यातील जे आमदार गुवाहाटीला गेले होते त्यांच्याबद्दल लोकामध्ये आजही संभ्रम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २०० आमदार निवडून आणण्याचा दावा करत आहेत, पण फुटीर आमदारांच्या मतदार संघातच जनतेचा त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे, असेही नाना पटोले म्हणाले,

Share