नवरात्रोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून महिलांसाठी महत्वाची घोषणा

मुंबई : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिलांसाठी एक खास अभियान राबवलं जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे विशेष अभियान राबवलं जाणार आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी अशी विनंती आपल्याला करीत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडूनं राज्यभरात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबवलं जाणार आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते २ या वेळेत १८ वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे. आजारी महिलांना उपचार आणि आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. तसेच सर्व माता भगिनींनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

Share