विदर्भात मनसेला खिंडार; प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा झटका बसला आहे. हिंगणाघाट येथील ५० पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काॅँग्रेस प्रक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे वर्धा उपजिल्हाध्यक्ष अमोल बोरकर यांच्यासह ५० पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे वर्धा जिल्ह्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख सुबोध मोहिते, वर्धा जिल्हा निरीक्षक राजु ताकसाळे, वर्धा जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, हिंगणघाट मतदारसंघात पक्षाने एकदाच बाजी मारली आहे. मात्र मागील काही काळात ती जागा आपण जिंकू शकलो नाही. आजच्या पक्षप्रवेशाने ही जागा पुन्हा पक्षाला मिळवून देण्यास मोठा हातभार लागेल यात शंका नाही. पक्ष संघटनेत ताकद असेल तर सत्तेत नसतानाही आपण लोकांचे प्रश्न सोडवू शकतो. सुदैवाने आपण आता सत्तेत आहोत, त्यामुळे आपल्या विभागाचे प्रश्न तुम्ही हक्काने सांगू शकता. हिंगणघाट विधानसभेचे वातावरण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सकारात्मक करण्याची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांचा जनमानसातील प्रभाव पाहून त्याला उचलून घेणारा पक्ष आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना राजकीय कारकिर्द घडविण्याची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच मिळेल, असा ठाम विश्नास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Share