पावसाळ्याची सुरूवात होताच वारकऱ्यांना ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. ऊन, वारा, पावसाला न जुमानता दरवर्षी लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होतात. गावागावातून दिंड्या निघतात. पंढरीची वारी म्हणजे मराठी जनांसाठी एक मोठा सोहळाच असतो. यंदा 340 वा पालखी सोहळा रंगणार आहे. 6 जुलै रोजी आषाढी वारी असून आता 18 आणि 19 जुन रोजी देहू आणि आळंदीहून संत तुकाराम आणि संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
सध्या देहू नगरी वारकऱ्यांनी गजबजली आहे. इंद्रायणी काठी भक्तांची लगबग पाहायला मिळतेय. आज दुपारी 2:30 वाजता तुकोबांची पालखी पंढरपूरकडे वाटचाल करणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या अनुषंगाने मंदिर प्रशासनाने विशेष खबरदारी घेत सर्व उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. तर याप्रसंगी देहू नगरी आणि मंदीर परिसर फुलांनी सुशोभित केलेला पाहायला मिळतोय.
आज पालखीचा प्रस्थान सोहळा रंगणार असून देहूच्या इनामदार वाड्यात पहिला मुक्काम असणार आहे. त्यानंतर निगडी, आकुर्डीमार्गे पालखी पुणे शहराकडे प्रस्थान करेल. त्यानंतर पुणे शहर, लोणी काळभोर, यवत, बारामती, इंदापूर, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी असा प्रवास करत पालखी 5 जुलै रोजी पंढरपूर मुक्कामी जाणार आहे. 6 जुलै रोजी एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान असून पालख्या 10 जुलै रोजी पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील.