राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी

मुंबईः  राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात आज आक्रमक पणे झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्या वक्तव्याचे पडसाद उमटले दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होते. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपले अभिभाषण केवळ काही मिनिटातच आटोपते घेतले. राज्यपालांच्या अभिभाषणा दरम्यान सत्ताधाऱ्यांनीच घोषणाबाजी केल्याने अवघ्या २२ सेकंदात राज्यपालांनी अभिभाषण आटोपते घेतले.

 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अभिभाषणासाठी सभागृहात येताच सत्ताधारी नेत्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणाबाजी केली. यानंतर राज्यपाल यांनी अवघ्या २२ सेकंदात भाषण पटलावर ठेवत थांबवले. त्यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे नाव घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अधिकच घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले मात्र त्यानंतर पुन्हा भाजप आमदारांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राज्यपाल अभिभाषण सोडून निघून गेले.

सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर

राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यातच सोडले आणि त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाले. मात्र त्यानंतरही सत्ताधाऱ्यांचा आक्रमक पवित्रा कायम होता. सभागृहात घोषणा देणारे सत्ताधारी पक्षाचे सर्व आमदार विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांचा निषेध केला. आमदार संजय दौंड यांनी तर शीर्षासन अर्थात खाली डोकं वर पाय करत राज्यपालांचा आणि विरोधी पक्षाचा निषेध केला.

 

 

Share