शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणार – दीपक केसरकर

पुणे : शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांची लवकरच व्यापक बैठक बोलविणार असून, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पूर्तता प्राधान्याने केली जाणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत दिली. आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल यांच्या लक्षवेधी सूचनेला केसरकर उत्तर देत होते.

शिवाजी नगर ते हिंजवडी मेट्रो रेल्वे प्रकल्पाची २३.३ किलोमीटर लांबी आहे. संकल्पना करा, आर्थिक पुरवठा करा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वानुसार हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. या कामास सुरुवात झाली असून प्रकल्प कालावधी ४० महिने आहे. या प्रकल्पातील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी एकेरी मार्ग करणे, नो पार्किंग, नो हॉल्टिंग झोन करणे, सायकल ट्रॅक आणि फुटपाथ काढून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहेत. पुणे मुंबई महामार्गावरील चांदणी चौकातील पुलाचे कामही लवकरच पूर्ण केले जाईल.

Share