आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल ; जयंत पाटील यांना विश्वास

मुंबई : महाविकास आघाडी अडचणीत नाही. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे. त्यामुळे आघाडीचा चौथा उमेदवार चांगल्या मतांनी विजयी होईल अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

अपक्षांशी विविधस्तरावर चर्चा सुरू आहे. योग्यवेळी याबाबत आपल्याला माहिती दिली जाईल. वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वेळी लोकांची नाराजी होत असते. परंतु समाजवादी पक्ष हा उत्तरप्रदेशमध्ये भाजपविरोधी राहिलेला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देतील.

कोरोनामुळे सर्व आमदार हे मुंबईत

सध्या कोरोनाची साथ आहे. कोरोनामुळे सर्व आमदार हे मुंबईत असावेत आणि मतदानासाठी उपलब्ध असावेत यासाठी हे सर्व सुरु आहे. मतं तर दाखवूनच द्यायची असतात त्यामुळे कुणी कुणाला पळवण्याचा प्रश्नच येत नाही,असेही जयंत पाटील म्हणाले.

निवडणुका बिनविरोध व्हायला हव्या होत्या

मोर्चेबांधणीचा प्रयत्न भाजप करणारच. या निवडणुका बिनविरोध व्हायला हव्या होत्या. जो उमेदवार निवडणूक रिंगणात आहे; तो मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणारच त्यात दोष देण्याची गरज नाही. पण मुळातच महाविकास आघाडी सरकारला सुरुवातीला १७० आमदारांनी पाठिंबा दिलेला होता त्यामुळे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Share