भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा आहे; राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना नवा आदेश

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात पुन्हा एकदा आक्रमक भुमिका घेतली आहे.  राज ठाकरेंनी आज  मनसैनिकांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज ठाकरे त्यांनी भोंग्यांच्या विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे, त्यासाठी कामाला लागा असं राज ठाकरे म्हणाले आहेत. यासाठी राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे एक पत्र पाठवले असून, हे पत्र मनसैनिकांनी घराघरात पोहचवावे असे सांगितले आहे.

राज ठाकरे पत्रात काय म्हणाले?

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,

मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलंच नव्हे तर देशातलं राजकारण ढवळून निघालं. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझं एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलं आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा.

तुम्ही एकच करायचं आहे माझं पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील – घराघरात स्वतः नेऊन द्यायचं आहे कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही..

मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही…

Share