संजय राऊतांची होणार सुटका? जामीन अर्जावर आज सुनावणी

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जमीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. गेल्या सुनावणी वेळी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं राऊतांच्या जामीन अर्जावरी आपला निर्णय राखून ठेवला होता. यावरच आज राऊत यांची न्यायालयीन कोठडी संपणार असून न्यायालय या निकालाचे वाचन करणार आहे. त्यामुळे संजय राऊतांना बेल मिळणार की ते पुन्हा जेलमध्ये जाणार याकडे ठाकरे गटाचं लक्ष लागून आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील मागील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी पार पडली होती. यावेळी राऊतांच्या जामिनासंदर्भात ईडीनं आपलं लेखी उत्तर न्यायालयात सादर केलं. त्यानंतर न्यायालयानं जामीनावरील आपला निकाल राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी होणार असून न्यायालय निकाल देणार आहे. मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज एकाच दिवशी निकाल देण्यात येणार आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे तीन हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११ , २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले. पत्राचाळ जमीन घोटाळा हा १,०३४ कोटी रुपयांचा असल्याचा संशय ईडीला आहे.

Share