अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड

पुणेः सामाजिक कार्यकर्त्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नाव जागतिक पातळीवर गाजविणाऱ्या आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचे काल रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

सिंधुताई यांना प्रकृती अस्वाथामुळे २४ नोव्हेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २५ नोव्हेंबरला शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत कमी अधिक सुधारणा होत होती. त्यांनतर गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांना गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, काल रात्री ८ वाजून १० मिनिटांनी हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.

सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणत असे सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. नको असताना मुलगी झाली म्हणून तिचे नाव चिंधी ठेवले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आले.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.

Share