जुन महिना सुरू झाल्यापासून दररोज अनेक दुर्घटना घडत आहेत. अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या विमान अपघातात अनेक जण मृत्युमुखी पडले. ही घटना अजून ताजी असतानाच केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या जैस्वाल कुटुंबातील तिघांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला. तर यानंतर काल पुण्यातून मोठी बातमी समोर आली. काल पुण्यातील कुंडमळा या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळला. यात पर्यटनासाठी आलेल्या 4 पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला तर 51 जण जखमी झाले आहेत.
कुंडमळा या ठिकाणी कोसळलेला पूल 32 वर्ष जुना आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून हा पूल वापरासाठी बंद केला होता. या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. नुकतच या घटनेचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये तो पूल पडताना दिसत आहे, पण यावेळी त्या पूलावरती लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. आता हा फोटो समोर आल्यानंतर अनेक लोक एकाच वेळी या पुलावरती आल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आत्तापर्यंत त्या पुलावर किती लोक होते त्याचा आकडा समोर आला नाही. मात्र, नुकताच समोर आलेला हा फोटो पाहून त्या ठिकाणी किती गर्दी होती याचा आपण अंदाज लावू शकतो. किमान 50 ते 100 पर्यटक पुलावर उभे होते. त्याचवेळी पूल मधोमध तुटला आणि अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यातच 4 जणांचा जीव गेला तर अनेक जण जखमी आहेत.
इंद्रायणीच्या पात्रात अनेक मोठे भोवरे, रांजणखळगे आहेत. पाऊस पडला की ही नदी दुथडी भरून वाहू लागते. तेव्हा हा परिसर मोठा विलोभनीय दिसतो. हेच निसर्गसौंदर्य टिपण्यासाठी पर्यटक सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी गर्दी करतात. अशीच गर्दी 15 जून रोजी पर्यटकांनी या ठिकाणी केली आणि यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण त्यासोबतच तिथे पर्यटनासाठी गेलेल्या नागरीकांवरही टिका होत आहे. इंद्रायणी नदीवरचा पूल हा कमकुवत झाल्यानं त्यावरून ये-जा करण्यास सक्त मनाई होती, मग पर्यटक पुलावर कसे काय चढले? असा सवाल सध्या विचारला जातोय. या पुलावर जाण्यास बंदी होती तरीही सोशल मिडीयावरील रील्स, सेल्फी आणि फोटोच्या मोहापायी या ठिकाणी नागरीकांनी एकच गर्दी केली. हा पूल खरंतर नागरिकांना पायी येण्या-जाण्यासाठी आहे. तिथे प्रशासनाकडून सूचनाफलक देखील लावण्यात आला होता. तरीदेखील या पुलावरुन दुचाकींचं देखील येणं-जाणं सुरु होतं. घटना घडली तेव्हा तिथे तब्बल आठ ते नऊ दुचाकी होत्या, अशी माहिती घटनेतील जखमी झालेल्या एका तरुणाने दिली आहे. त्यामुळे हा पूल ओव्हरलोड झाला आणि नदीच्या पाण्यात कोसळला.
आजकाल प्रत्येकजणच सोशल मिडीयावर सक्रिय असतात. प्रत्येकालाच आपण कुठे गेलो, काय करतोय हे जगाला दाखवायचं असतं. यातूनच मग रील्स आणि सेल्फीच्या मोहाला तरूण बळी पडतात. बंदी झुगारून अनेक जण धोकादायक धबधबे, धरण पाहायला जातात. प्रशासनाचे आदेश दुर्लक्षित करून खळखळ वाहणार्या नदीत उतरतात आणि त्यात अनेक तरूण आपला जीव गमावून बसतात. दरवर्षी पावसाळ्यात अशा अनेक घटना घडतात. त्यामुळे कुठेही गेलो तरी आपण आसपासच्या परिस्थितीचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे. रिल्स आणि फोटोच्या नादात बेजबाबदारपणे वागून आपला जीव गमावणं कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने करायलाच हवा.
पावसाळी पर्यटन करताना पर्यटनस्थळी असलेल्या प्रशासकीय सुचनांचं पालन करणे, धोकादायक ठिकाणी जाणं टाळणे, गेलो तरी दुरूनच तेथील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, धोकादायक पातळी न ओलांडणे अशी काळजी नागरीकांनी घ्यायला हवी.