महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या दामु नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ बाळके यांना तसेच, मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापक कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतेच वर्ष २०२२ च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. देशातील एकूण ४६ शिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला असून महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या औचित्याने येथील विज्ञान भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

Share