शिंदे गटातील ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी ९ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आला आहे. आता शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आजपासून पावसाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर केवळ १८ मंत्र्यांचेच खातेवाटप करण्यात आलं आहे. बाकीची उर्वरीत खाती ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राखून ठेवण्यात आली होती. मात्र, अधिवेशन काळात विरोधक या मुद्द्यावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न करु शकते. त्यामुळे अधिवेशन सुरु होण्याअगोदरच शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे या अतिरिक्त खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोणत्या मंत्र्याकडे कोणते अतिरिक्त खाते

उदय सामंत – माहिती आणि तंत्रज्ञान

शंभूराज देसाई- परिवहन

दादा भूसे- पणन

संजय राठोड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य

तानाजी सावंत- मृद व जलसंधारण

अब्दुल सत्तार – आपत्ती व्यवस्थापन

दीपक केसरकर- पर्यावरण व वातावरणीय बदल

संदीपान भुमरे- अल्पसंख्याक व औकाफ

Share