पावसाळ्याची सुरूवात होताच वारकऱ्यांना ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. ऊन, वारा, पावसाला न जुमानता दरवर्षी लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होतात. गावागावातून दिंड्या निघतात. पंढरीची वारी म्हणजे मराठी जनांसाठी एक मोठा सोहळाच असतो. यंदा 340 वा पालखी सोहळा रंगणार आहे. 6 जुलै रोजी आषाढी एकादशी असून आता 18 आणि 19 जुन रोजी देहू आणि आळंदीहून संत तुकाराम आणि संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत.
18 जुन रोजी संत तुकोबा महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा रंगणार आहे. तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 19 जुन रोजी आळंदीहून पंढरपूरकडे मार्गक्रमण करणार आहे. सगळं वातावरण सध्या प्रसन्न आणि भक्तिमय असून देहू आळंदी वारकऱ्यांच्या टाळ मृंदुंगाने दणाणून सोडली आहे. आता जसजशी पालखी पुढे सरकेल तशी सगळ्यांना ओढ लागेल ती रिंगण सोहळ्याची. पण माऊली हा रिंगण सोहळा म्हणजे नक्की काय? त्याचं स्वरूप कसं असतं ? चला जाणून घेऊया…
पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा सगळ्यांनाच आकर्षित करतो. रिंगण सोहळा म्हणजे पालखीभोवती गोलाकार फिरणं. चालून थकलेल्या वारकऱ्यांच्या मनाला विसावा देण्याचं काम हा सोहळा करतो. रिंगण सोहळ्याचे दोन प्रकार असतात. एक उभं रिंगण आणि दुसरं गोल रिंगण.
मोठ्या मैदानात रिंगण आयोजित केलं जातं. चोपदार हे रिंगण लावतात. गोल रिंगणात मध्यभागी पालखी, त्याभोवती पताकाधारी वारकरी आणि दिंड्या असतात. त्यानंतर रिंगणासाठी मोकळी जागा आणि त्याभोवती वारकरी आणि भाविक उभे राहतात. या मोकळ्या जागेत तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, पताकाधारी वारकरी आणि विणेकरी एका लयीत धावतात. या रिंगणाचं मुख्य आकर्षण म्हणजे अश्वांची दौड. या सोहळ्यात दोन अश्व धावतात. एका अश्वावर जरी पताका घेतलेला स्वार असतो. तर दुसरा अश्व रिकामा असतो. या दुसऱ्या अश्वावर स्वतः संत विराजमान असतात असं मानलं जातं. हे अश्व रिंगणातून पालखीला तीन फेऱ्या मारतात. यावेळी अवघा परिसर माऊली माऊलीच्या जयघोषात दणाणून जातो.
उभे रिंगण करताना दिंड्या गोलाकार उभ्या न राहता एकमेकांसमोर उभ्या राहतात आणि मधोमध अश्वांची दौड होते. रिंगणाचा एक उपप्रकार म्हणजे बकरी रिंगण. संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यात मेंढरांचे किंवा बकरीचं रिंगण होतं . पालखी सोहळ्याच्या मार्गावर असलेले शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन येतात . ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. पालखी सोहळ्यात अशा प्रकारे सर्वांना मानाचं स्थान दिलं जातं.
या सोहळ्यात टाळ, मृदूंग हाती घेत वारकरी अभंग, भजनं गातात, फुगड्या घालतात. हा सोहळा खूपच विलोभनीय आणि मन प्रसन्न करणारा असतो. अतिशय भक्तिमय वातावरणात हा रिंगण सोहळा पार पडतो.
संत तुकोबा महाराजांच्या पालखीचं पहिले गोल रिंगण 28 जून रोजी बेलवडी येथे होणार आहे. त्यानंतर इंदापूर, अकलूज येथे गोल रिंगण तर माळीनगर, बाजीराव विहीर आणि वाखरी येथे उभे रिंगण होणार आहे. 6 जुलै रोजी एकादशी नगरप्रदक्षिणा आणि चंद्रभागा स्नान असून पालख्या 10 जुलै रोजी पंढरपुरातून देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील.
तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण बरड या ठिकाणी होणार आहे. तर त्यानंतर सदाशिवनगर, खुडूस. ठाकूर बुवा समाधी येथे गोल रिंगण तर बाजीराव विहीर या ठिकाणी उभं रिंगण होणार आहे.