विधान परिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार जिंकतील : चंद्रकांत पाटील

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान आहे. भाजपचे पाचही उमेदवार या निवडणुकीत जिंकतील. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील बेबनावाचा फायदा भाजपला होईल. महाविकास आघाडीतील एकाची विकेट पडेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीने कितीही दावा केला तरी त्यांचा एक उमेदवार पराभूत होईल. फक्त तो कोणत्या पक्षाचा असेल, हे त्यांच्यातील बेबनाव ठरवेल. घोडा-मैदान फार लांब नाही. लवकरच चित्र स्पष्ट होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नाना पटोलेंना आव्हान

विधान परिषद निवडणुकीसाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजपतर्फे महाविकास आघाडीच्या आमदारांना धमकावले जात असल्याचा आरोप आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यावर पराभवानंतर काय कारणे सांगायची, याची तयारी पटोलेंनी आताच सुरू केली आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. तसेच ‘मविआ’च्या आमदारांना धमकावल्याची कॉल रेकॉर्डिंग नाना पटोलेंकडे असेल, तर त्यांनी ती पत्रकारांसमोर आणावी, असे आव्हानही त्यांनी दिले.

राज्यसभेच्या निवडणुकीतदेखील सहाव्या उमेदवाराला अतिरिक्त मतांची गरज होती. ती कशी मिळणार, असे प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, ती मते आम्ही मिळवली आणि आमचा उमेदवार विजयी झाला, असे सांगून पाटील म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांच्यातील बेबनाव थांबवता आला नाही. शिवसेना नेते संजय राऊत हे राज्यसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर अपक्षांवर तुटून पडले आहेत. अपक्षांना स्वत:चे मत आहे. त्यांचा अधिकार ते ठरवतील. अडीच वर्ष अपक्षांनी साथ दिली तर मग ते चांगले आणि एका निवडणुकीत त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे मतदान केले असेल तर त्यांना बघून घेऊ, असे म्हणणे चुकीचे आहे, असे पाटील म्हणाले.

अपक्ष आमदारांना धमकी देणे हे कसले राजकारण?
राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान केल्यामुळे संजय राऊत चवताळले आहेत. त्यामुळे ते अपक्ष आमदारांवर आरोप करीत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांना बघून घेऊ, विकास निधी देणार नाही, अशा शब्दांत धमकावले जात आहे. महाविकास आघाडी असेच राजकारण करणार का? अपक्ष आमदार हे शिवसेनेच्या घरचे आहेत का, असा सवालही त्यांनी केला.

‘अग्निपथ’ योजनेमुळे सैन्यातील मूळ भरती बंद होणार नाही
‘अग्निपथ’ योजनेवरून देशभरातील तरुण सध्या रस्त्यावर उतरला आहे. त्यावर पाटील म्हणाले, ‘अग्निपथ’ योजना तरुणांच्या हिताचीच असून, तरुणांनी ती योजना समजून घ्यावी. ‘अग्निपथ’ योजनेमुळे सैन्यातील मूळ भरती बंद होणार नाही. त्यामुळे तरुणांनी अफवांना बळी पडू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन महिन्यांपूर्वी देशात १० लाख रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्याची सुरुवात ‘अग्निपथ’ योजनेपासून होत आहे. तरुण मोठ्या संख्येने भाजपकडे जाण्याच्या शक्यतेने काँग्रेस धास्तावली आहे. त्यामुळेच तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. ‘अग्निपथ’ योजनेवरून सुरू असलेल्या आंदोलनात काँग्रेस आग ओतत असल्याची टीका पाटील यांनी केली. सध्या देशात जो हिंसाचार चालला आहे ते चुकीचे आहे. देशाची संपत्ती जाळणे चुकीचे आहे. तसेच आंदोलनादरम्यान एखादी केस दाखल झाल्यास पुढे कोणतीही नोकरी मिळवता येणार नाही. त्यामुळे तरुणांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Share