नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्याची भाजपची मागणी

 मुंबई : राज्यामध्ये सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी – नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदा, ४ नगर पंचायती व १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भाजपने केली. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या  नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची भेट घेतली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात सर्वदूर पडणारा पाऊस, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण तसेच ओबीसी राजकीय आरक्षणाचा अनुत्तरित प्रश्न लक्षात घेता नगरपालिका निवडणुका पुढे ढकला, असं निवेदन राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना भाजपच्यावतीने देण्यात आल. यावेळी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान, निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर नगरपालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यासाठी, २० जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवडणुकीचा कार्यक्रमा जाहीर होणार आहे. त्यामुळे, आता आयोग काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही निवडणुका पुढे ढकल्यासंदर्भातील मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करताना पावसाचा अंदाज घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे. आयोगाने पावसाच्या आकडेवारीचा विचार केला असला तरी वस्तुस्थितीचा विचार करावा, असे आमचे म्हणणे आहे. २०१९ व २०२१ अशी दोन वर्षे कराड शहराचा बहुतांश भाग काही आठवडे पाण्याखाली होता तर गेल्या वर्षी कागल शहराचा पंधरा दिवस पावसामुळे परिसराशी संपर्क तुटला होता. ही दोन उदाहरणे ध्यानात घेतली तर पावसाच्या बाबतीत वस्तुस्थिती ध्यानात घेण्याची गरज आहे.

Share