पावसाचा मनसेला फटका, राज ठाकरेंनी मेळावा पुढे ढकलला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडमोडींपासून दूर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. या प्रसिद्धीपत्रकातून राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना काही सूचना दिल्या आहेत. यामध्ये राज ठाकरे यांनी मनसेचा उद्या होत असलेला मेळावा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली आहे.

वाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, सस्नेह जय महाराष्ट्र

तुम्हाला जरा थोड्या तातडीने कळवतो आहे. आपण वास्तविक उद्या एक मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचं थैमान घाललेलं दिसत आहे. जनजीवन तर विस्कळीत आहेच परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हा सर्वांना सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे.

अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच थोडा पावसाचा अंदाज घेऊन तुम्हा सर्वांना कळवली जाईलच. दरम्यान, तुम्ही स्वत:ची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यत: नदीकाठाला जिथे लोक राहत आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली-कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुद्ध पाणी, अंथरूण-पांघरूण पुरवावं लागेल. मुख्यत: वृद्ध, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुले ह्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडे उन्मळून पडतात ती नंतर पुन्हा लावावी लागतील अशा खूप गोष्टी आहेत.

एक लक्षात घ्या की, अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करू नका. अर्थात असं काही होऊ नये, कुठलेही नैसर्गिक संकट येऊ नये ही आपली इच्छा आहे. फक्त सतर्कतेसाठी सांगितले. लवकरच भेटू..

आपला नम्र

राज ठाकरे

Share