ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच नंबर वन, युतीला जनतेचा स्पष्ट कौल – चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला स्पष्ट कौल दिला असून ५८१ पैकी २९९ ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच निवडून आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जनतेने या निकालाद्वारे विश्वास व्यक्त केला आहे. आपण दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात मतदान झालेल्या ग्रामपंचायतींपैकी ५८१ च्या निकालाची माहिती उपलब्ध झाली असून भारतीय जनता पक्षाचे सरपंच २५९ ठिकाणी निवडून आले आहेत. या निवडणुकीतही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सरपंच ४० ठिकाणी निवडून आले आहेत. दोन्हीचा एकत्रित विचार केला, तर पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये युतीचे सरपंच जनतेने निवडून दिले आहेत. भाजपला मिळालेल्या या यशासाठी मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.

राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालावरून नव्या सरकारच्या बुलेट ट्रेनने महाविकास आघाडीच्या ऑटो रिक्षावर मात केल्याचे स्पष्ट झाल्याचे आहे. बुलेट ट्रेन सुसाट निघाली आहे, असेही ते म्हणाले. जनतेतून थेट निवडून दिलेला सरपंच हा संपूर्ण गावाला उत्तरदायी असतो. त्या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकारने सरपंचाची थेट निवड करण्याचा निर्णय घेतला होता, त्यावरही जनतेने या निकालाद्वारे शिक्कामोर्तब केले आहे.

Share