बीडच्या कायदा-सुव्यवस्थेवर विशेष बैठक बोलवा- पंकजा मुंडे

बीड :  जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णत: ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवर राहिला नाही. चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनांमुळे सर्व सामान्य नागरिकांत भीती निर्माण झाली असून याची गंभीर दखल घेतली पाहिजे, त्यासाठी फक्त बीडच्या विषायवर विशेष बैठक बोलवावी अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्याचे गृहमंत्री, गृह राज्यमंत्री आणि विशेष पोलिस महानिरीक्षक यांना पत्र पाठवून केली आहे.
त्या पत्राच्या माध्यमातून म्हणाल्या आहेत, गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, त्याला कारणही तसेच आहे. गुन्हेगारी स्वरुपाच्या घटना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. चोऱ्या, खून, मारामऱ्या, महिलांवर अत्याचार, खंडणी वसूली, तलवारी, रिव्हाॅल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. बीड,परळी, अंबेजोगाई, माजलगांव, गेवराई, सह सर्वच तालुक्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडला आहे.  जिल्हयात पोलिस यंत्रणा आहे की नाही ? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटना, अतिशय चिंताजनक बाब बनली आहेत. अशा घटना गंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झालीय.केवळ बीडच्या कायदा-सुव्यवस्था विषयावर स्वतंत्र व विशेष बैठक घेऊन, गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत आणि परिस्थिती नियंत्रणात आणून सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील भिती दुर करावी. अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केलीय. त्यामुळे आता आता बीडच्या विषयावर बैठक होणार का? जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना कमी होणार का? याकडं मात्र आता सर्वांचेच लक्ष्य लागले आहे.
Share