शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करावेत – नाना पटोले

मुंबई : राज्यात विदर्भ व मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार शेतकरी विरोधी असून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. भाजपा विरोधी पक्षात असताना शेतकरी आत्महत्यांप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत असे, आता या सरकारवर गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

सरकारची मदत अपुरी, शेतकऱ्यांची निराशा
अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी आहे. एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत जाहीर केल्याचे सांगून राज्य सरकार फसवणूक करत असल्याचे आरोप पटोले यांनी केले आहेत. एनडीआरएफचे निकष जुने आहेत. खताच्या किंमतीही तिप्पट झाल्या आहेत, बी- बियाणे, खते, किटकनाशकांचे भावही वाढलेले आहे. या महागाईच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेले मदत अत्यंत कमी आहे. केंद्र सरकारनेही हात वर करून शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले आहे. कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार व बागायती, फळबागेसाठी १ लाख ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या परस्थितीकडे कानाडोळा
राज्यातील शेतकऱ्यांची परस्थिती हा सरकारला देखील माहिती आहे. तब्बल दीड महिना पाऊस लागून राहिल्याने सर्वत्र पाणीच-पाणी अशी स्थिती आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ घोषित करुन भरीव मदत करणे गरजेचे आहे. शिवाय ही सर्व स्थिती सरकारला माहिती आहे असे असतानाही ओला दुष्काळ जाहिर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. भरीव मदत देऊन राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा संदेश गेला पाहिजे. पण सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे. शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या टाळूवरचे लोणी खाणारे हे सरकार असल्याचा आरोप पटोले यांनी केले आहे.

Share