मनसे-भाजप युतीच्या चर्चेवर चंद्रकांत पाटलांच स्पष्टीकरण

पुणे : मुंबईत गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केल होत. तसेच महाविकास आघाडीवरही जोरदार टिका केली होती. त्यानंतर भाजपचे काही नेते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटून गेले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजप-मनसे युती होणार. अशी चर्चा सुरू झाली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनसेला भाजपची बी टीम असल्याचं म्हटलं आहे. या सगळ्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट उत्तर दिलं आहे.

आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात अभिवादन करण्यासाठी आले असताना ते बोलत होते. ते म्हणाले,  “राज ठाकरे साहेब एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. ते कोणाची बी टीम म्हणून काम करत नाहीत. त्यामुळे त्यांना जी मतं मांडायची आहेत. त्यांनी ती त्या-त्या वेळेला मांडली आहेत. अनेकदा मोदींच्या विरोधातही मांडली आहेत. महाविकास आघाडी आणि पवार साहेबांचं असं आहे, त्यांना बरं म्हटलं तरच बरं, कोर्टाने त्यांना न्याय दिला तर न्याय आणि कोर्टाने किरीट सोमय्या यांना न्याय दिला की काहीतरी गडबड हे काही बरोबर नाही. राज साहेब ठाकरे हे त्यांची मतं अतिशय परखडपणे मांडत असतात”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, मनसेला भाजपसोबत घेण्याचा असा कुठलाही प्रस्ताव नाही. प्रस्ताव आल्यावर विचार करण्यासाठी भाजपाची १३ जणांची कोअर कमिटी आहे. ते देखील यामध्ये निर्णय घेऊ शकत नाही. फार फार तर केंद्राकडे प्रपोजल पाठवू शकतात. त्यामुळे आता अशी कुठलीही शक्यता नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

Share