अहमदनगरचं नामांतर करा, गोपीचंद पडळकरांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी

मुंबई : अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यापुर्वी महाविकास आघाडीचे सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पडळकरांनी मागणी केली होती.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव हे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी हे आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे अवघ्या हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेव्हा मुघल, निजामशाहीत हिंदूसंस्कृतीवर हल्ले होत होते, मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदुसंस्कृतीत प्राण फुंकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. अनेक घाट, बारव बांधले. मंदिरांचे पुनर्निर्माण केलं, स्त्रीयांना सन्मान मिळवून दिला. लोकहितासाठी कुशल प्रशासनाचा वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. आज जे काही या देशातलं सांस्कृतिक वैभव टिकून आहे त्यात हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मोठा वाटा आणि वारसा आहे. असं आमदार पडळकर यांनी म्हटलं आहे.

सोबतच अहमदनगरची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये असंही पडळकर यांनी म्हटलं आहे.त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करावे ही लोकभावना आहे असं त्यांनी म्हटलं आहे. हिंदू राजमाता, हिंदू संस्कृतीच्या जीर्णोद्धारकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे, अशी मागणी पडळकर यांनी पत्रातून केली आहे.

Share