प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का? – बावनकुळे

नवी दिल्ली : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यात आज बैठक होणार आहे. यांच्यात आज बैठक होणार आहे. आगामी पालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर असं नवं समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नव्या युतीवरून जोरदार टिका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रकाश आंबेडकर म्हणजे दलित, मागासवर्गीय मतं आहेत का? आंबेडकरांनी सगळी मते त्यांच्याकडे घेतली आहेत का? मी परवा आदिवासी नंदूरबारमध्ये होतो. ७५ हजार आदिवासी कुटुंबांनी धन्यवाद मोदीजी हे पत्र लिहिलं. त्यांनी हे पत्र का लिहिलं? आदिवासी समाजातील एका महिलेला राष्ट्रपती केलं म्हणून त्यांनी मोदींचं धन्यवाद केलं.

आदिवासी समाज कोणाची जहागिरी आहे का? तो समाज आहे आणि समाज म्हणूनच निर्णय करत असतो. तो कोण्या नेत्याच्या म्हणण्यानुसार निर्णय करत नाही. त्या समाजाला आपल्या हिताचं काय हे कळतं. मोदी आपलं हित जोपासत आहेत हे त्यांना कळतं. मागासवर्गीय समाजालाही वाटतं की मोदी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर संविधानाचं रक्षण करत काम करत आहेत. त्यामुळे मागासवर्गीय मतं कोणा एकाची जहागिरी नाही,असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं.

Share