माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

पुणेः मावळ मतदार संघाचे शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारावेळी निधन झाले. आज दुपारी ३ वाजून २५ मिनीटांनी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ७८ वर्षाचे असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री बाबर आणि २ मुले असा परिवार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यावरील उपचार सुरू होते. त्यातच त्यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उद्या सकाळी ११ वाजता निगडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून बाबर पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यांवरील उपचारासाठी ते खाजगी रुग्णालयात दाखल होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली होती. त्यामुळेच २६ जानेवारीला ते त्यांच्या बँकेत ध्वजारोहणासाठी हजर होते. पण त्यानंतर पुन्हा अपचनामुळं त्रास होऊ लागला. म्हणून त्यांना चिंचवडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी मात्र तब्येत खालावल्याने पुढच्या उपचारासाठी बाणेरच्या खासगी रुग्णालयात भरती करण्या आलं होतं. पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

गजानन बाबर यांची राजकीय  कारर्किद
मुळचे सातारा जिल्ह्यातील असलेल्या गजानन बाबर यांनी १९९० साली वाई मतदारसंघातून विधानसभा लढविली होती. त्यावेळी त्यांना मदनराव पिसाळ यांच्या विरोधात २० हजार ५१७ मते मिळाली होती. त्यानंतर नव्वदच्या दशकात त्यांनी पिंपरी – चिंचवडच्या राजकारणात स्थान निर्माण केले होते. एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. पिंपरी चिंचवडमधील काळभोरनगर येथे शिवसेनेची पहिली शाखा देखील त्यांनीच सुरु केली होती, यानंतर पिंपरीमधील पारंपरिक प्रस्थ काळभोर यांना हादरा देत बाबर यांनी पहिल्यांदा भगवा फडकवला.

छोटे व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी आदींच्या ४० संघटनांवर बाबर यांचे वर्चस्व होते. याच ताकदीवर ते ३ वेळा नगरसेवक, हवेली मतदार संघातून २ वेळा आमदार झाले. मात्र २००४ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलास लांडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण त्यातूनही हार न मानत २००९ ते २०१४ या दरम्यान ते मावळ मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेले. “किराणा दुकानात काम करणाऱ्या पोराला बाळासाहेबांनी आमदार-खासदार केले”, असे बाबर यांच्याबद्दल बोलले जायचे. मात्र २०१४ साली शिवसेनेने त्यांचे तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना दिले. त्यामुळे तेव्हा पासूनच ते पक्षावर नाराज होते आणि त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. मात्र तिथे फार काळ ते रमले नाहीत. महापालिका निवडणूक तोंडावर आल्यानंतरही शिवसेनेकडून विशेष जबाबदारी दिली जात नसल्यामुळे ते पक्षावर नाराज हाेते. त्यानंतर २०१७ साली त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपला जवळ केले होते.

Share