तरुणांची माथी भडकवण्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार द्या : नाना पटोले

मुंबई : भोंग्याचा मुद्दा पुढे करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. या प्रकारामुळे राज्याची बदनामी तर होत आहेच पण गुंतवणुकीवरही परिणाम होईल आणि रोजगार निर्मितीला खिळ बसण्याचा धोका असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. घटनेने सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. त्यात जर कोणी अडथळे आणत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी व महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी चालवलेला हा तमाशा बंद करावा, असेही मत पटोले यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सर्व धर्मियांना त्यांचे सण, उत्सव साजरे करण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. जे लोक दुसऱ्या धर्माच्या आड येतात. रमाजानसारख्या पवित्र सणात अडथळे आणत असतील तर त्यांच्यावर राज्य सरकारने कडक कारवाई केली पाहिजे.

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. सुप्रीम कोर्टाचे भोंग्याबाबत जे निर्देश आहेत, त्याप्रमाणे सरकार कारवाई करत आहे. पण त्याचा बाऊ करून जर कोणी राज्यात अशांतता निर्माण करत असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही. राज्यात धर्मिक अस्थिरता निर्माण करून राज्याच्या विकासाला खिळ घालण्याचे काम केले जात आहे. राज ठाकरे यांनी तरुणांची माथी भडकवण्यापेक्षा त्यांच्या हाताला रोजगार देण्याचा विचार करावा. राज ठाकरे यांना पुढे करून भाजपा केंद्रातील मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी वापर करत आहे. केंद्रातील सरकारला राज ठाकरे यांनी जाब विचारला पाहिजे परंतु दुर्दैवाने त्यांच्या भाषणात सामान्य जनतेला भेडसावणाऱ्या महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर एकही शब्द नव्हता. भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्याचा वापर करुन घेत आहे.अशी टिका पटोले यांनी यावेळी केली.

Share