…तर उद्धव ठाकरे आहे ते आमदारही गमावतील – चंद्रशेखर बावनकुळे

औरंगाबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इतका धसका का घेतला आहे, ते समजत नाही. त्यांच्याविषयी उद्धव ठाकरे यांनी विचार करून बोलावे, नाही तर उरलेल्या आमदारांपैकी बहुतेक जण त्यांना सोडून जातील आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी त केवळ चारच उरतील, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. ते मुंबईत आले तर त्यामध्ये ठाकरे यांना चुकीचे वाटण्याचे कारण नाही. अमित शाह हे उद्धव ठाकरे यांचा कधी उल्लेखही करत नाहीत. त्यांचे नाव घेऊन टीका करण्याने उद्धव ठाकरे यांनी जे गमावले आहे ते परत येणार नाही. उलट एक दिवस उद्धवजींची अवस्था माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी होईल की आणि केवळ चारच जण उरतील. उरलेले थोडे आमदार त्यांनी सांभाळावेत नाही तर मुख्यमंत्री शिंदे त्यांना कधी नेतील कळणारही नाही, असा टोला त्यांनी लगावला.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ६०८ पैकी २९४ सरपंच भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आहेत. आपल्याकडे त्यांची नाव व पक्षातील पदांसहीत पूर्ण माहिती आहे. त्याखेरीज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ४१ सरपंच निवडून आले आहेत. अशा प्रकारे ६०८ पैकी ३३५ सरपंच हे भाजपा-शिवसेना युतीचे आहेत. या बाबतीत जे कोणी राजकीय पक्ष दावे करत आहेत त्यांना आपले आव्हान आहे की, त्यांनी सविस्तर यादी द्यावी. त्याचबरोबर आम्हीही देऊ. भारतीय जनता पार्टी राज्यातील सर्व ९७,५०० बूथमध्ये पक्ष संघटना बळकट करत असून आम्ही ५१ टक्के मते मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. आमच्या विरोधात तीनही पक्ष एक झाले तरी आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राज्यात लोकसभा निवडणुकीत किमान ४५ आणि विधानसभा निवडणुकीत किमान २०० जागांवर विजय मिळवू”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मराठवाडा आणि विदर्भाच्या वैधानिक विकास मंडळांना महाविकास आघाडी सरकारने मुदतवाढ दिली नाही हे त्या आघाडीचे मोठे षडयंत्र होते. महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल महोदय बारा आमदार देत नाहीत तोपर्यंत वैधानिक विकास मंडळ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण शिंदे फडणवीस सरकारने मात्र सत्तेवर आल्यानंतर लगेचच मराठवाडयाच्या विकासासाठी काम सुरू केले आहे. मराठवाडा वॉटरग्रीड आणि समुद्रात जाणारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याकडे वळविणे या कामांवर शिंदे फडणवीस सरकारने भर दिला आहे, याबद्दल सरकारचे अभिनंदन केले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Share