तानाजी सावंतांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा; नाना पटोलेंची मागणी

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील सर्वच पक्ष प्रयत्न करत असताना शिंदे- फडणवीस सरकारमधील आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबादार विधाने केले आहे. तानाजी सावंत यांचे हे विधान मराठा समाजाची बदनामी करणारे व त्यांचा अपमान करणारे असून त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावंत यांच्या विधानावर खुलासा करावा व बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी काॅँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाचा समाचार घेताना नाना पटोले पुढे म्हणाले की, मराठा आऱक्षाची मागणी मागील अनेक वर्षापासून होत आहे. मराठा समाजाला आऱक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरु आहेत. सरकारी पातळीवर व न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.  महाविकास आघाडी सरकाराने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. २०१४ साली काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅँग्रेस आघाडीने सरकारने मराठी समाजाला आरक्षण दिले होते. परंतू आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे, असं त्यांनी सांगितलं.

तानाजी सावंत हे सातत्याने वादग्रस्त विधाने करून वातावरण बिघडवण्याचे काम करत असतात. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही त्यांनी नुकतेच वादग्रस्त विधान केले होते. या महोदयांनी याआधी महाराष्ट्राला विकत घेण्याची भाषा केली होती. तानाजी सावंत यांचे विधान सत्तेचा माज दाखवते पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, सत्तेची मस्ती कशी उतरवायची हे त्यांना चांगले माहीत असल्याचे पटोले यांनी म्हटले. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागावी व शिंदे-फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी पटोले यांनी केली.

तानाजी सावंत यांनी व्यक्त केली दिलगिरी

मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?”, असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत होता. माझ्या मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सबंध मराठा समाजाची माफी मागतो, असं तानाजी सावंत यांनी म्हटले.

Share