इम्पिरिकल डाटा गोळा करण्यासाठी आडनाव गृहित धरणे चुकीचे – नाना पटोले

मुंबई : ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होण्यासाठी इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. परंतू अनेक ठिकाणी आडनावावरून जात गृहित धरली जात असून ही पद्धत चुकीची आहे. ओबीसींची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.यासंदर्भात पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रात नाना पटोले यांनी म्हटलं की, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाले पाहिजे ही काॅँग्रेस पक्षाची भूमिका राहिली आहे. ओबीसी संदर्भातील डाटा गोळा करण्याचे कामही सुरु आहे पण आडनावावरून जात ठरवली जात असल्याचा प्रकार गंभीर आहे. एकाच आडनावचे लोक विविध जातील आहेत. ही पद्धत शास्त्रोक्त नाही, या पद्धतीने डाटा गोळा केल्यास ओबीसी समाजाची खरी संख्या समोर येणार नाही व समाजावर अन्याय होईल. ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जातीने लक्ष घालावे.

दरम्यान,ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे म्हणून सर्वांनी लक्ष घातले पाहिजे. ओबीसी संघटना, सर्व राजकीय पक्ष यांनी पुढाकार घेऊन ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी अचूक आकडेवारी (डाटा) जमा होईल यात लक्ष घालावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. पटोले यांच्या पत्रानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Share