चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव पुन्हा दोषी

नवी दिल्ली : चारा घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे सुप्रोमी लालू प्रसाद यादव यांना मोठा धक्का बसला आहे. दोरांडा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. रांची इथल्या विशेष सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह ७५ आरोपींना दोषी ठरवण्यात आलं असून २४ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लालूप्रसाद यादव यांना २१ फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

काय आहे चारा घोटाळा प्रकरण?
१९९६मध्ये बिहारमध्ये उघड झालेल्या चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना १९९७मध्ये अटक देखील करण्यात आली होती. हा घोटाळा झाला, तेव्हा लालू प्रसाद यादवच बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला होता.मात्र, त्यानंतर थेट २०१३मध्ये सीबीआय कोर्टानं चायबासा कोषागारातून बेकायदेशीररीत्या ३७.६७ कोटी रुपये काढल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना दोषी मानलं. त्यांना पाच वर्षांची कैद सुनावण्यात आली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्याच वर्षी डिसेंबरमध्ये जामीन मंजूर केला. त्यानंतर पुन्हा २०१७मध्ये लालू यादव यांना देवघर कोषागारातून ८९.२७ लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात दोषी सिद्ध करण्यात आलं. त्यावेळी न्यायालयानं त्यांना साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.अशा प्रकारे बेकायदेशीररीत्या पैसे काढण्याची एकूण पाच प्रकरणं चारा घोटाळा म्हणून जाहीर झाली होती. यापैकी चार प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव दोषी सिद्ध झाले आहेत. देवगड, चायबासा, रांचीतील डोरांड आणि डमका कोषागारातून पैसे काढल्याच्या प्रकरणात लालू यादव दोषी आढळले आहेत. बिहारच्या पशूसंवर्धन विभागात एकूण ९५० कोटींचा चारा घोटाळा झाल्याचं १९९६मध्ये उघड झालं होतं.

Share