‘तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला’ जाणून घेऊया, मकरसंक्रांत का साजरी करतात?

आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होतांना अतिशय उत्साह, आनंद, एकमेकांना मान सन्मान देण्याची पध्दत, रूढी परंपरा यांना फार महत्व दिल्याचे आपण पाहातो. मकर संक्रांतीच्या दिवशी ‘तीळ गूळ घ्या, गोड बोला’ असं म्हणत सर्वांना तिळ आणि गूळ वाटले जाते. या वर्षी मकर संक्रांतीचा सण पंचांगानुसार पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी म्हणजेच १४ जानेवारीला साजरा केला जाईल. ज्योतिषाचार्यांच्या मते, जर सूर्यास्ताच्या आधी सूर्याने मकर राशीत प्रवेश केला तर या दिवशी पुण्यकाळ असेल.

मकरसंक्रात सणापुर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सुर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते. आणि हा सुर्यदेव तापायलाच तयार नसतो! तो तयार होतो ते या मकरसंक्राती पासुन!

कधी येते मकरसंक्रांत 
मकरसंक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे हा सण कायम १४ जानेवारीलाच येतो. कधीतरी या सणाला १३ जानेवारी किंवा १५ जानेवारीला आल्याचे आपण पाहातो पण ही अपवादात्मक स्थिती सोडल्यास हा उत्सव नेहमी १४ जानेवारीला येतो. पौष महिन्यात जेव्हां सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे.

मकरसंक्रांतीपासुन हळुहळु दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. सुर्याची तीव्रता दाहकतेत बदलत पुढेपुढे सरकायला लागते आणि साधारण १०ते १५दिवसांच्या अंतराने रथसप्तमी असते. असे म्हणतात की या रथसप्तमीपासुन सुर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सुर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात.

विविध राज्ये आणि विविध नावे
मकर संक्रांत भारताच्या विविध राज्यात विविध नावाने आणि विविध पद्धतीने साजरी केली जाते जसे मकरसंक्रात – महाराष्ट्र, पोंगल – तामिलनाडु, गुजरात, राजस्थान, लोहढी –पंजाब, माघमेला –ओडिसा, भोगाली बिहु – आसाम, संक्रांती – कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, बिहार अशी विविध नावं या सणाला आहेत. प्रत्येक धर्म आपापल्या प्रथांप्रमाणे या दिवसाला साजरा करत असले तरी देखील आनंद, उत्साह, जल्लोष हा सगळीकडे असतोच असतो.

मकर संक्रांतीचे महत्व
मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान, उपवास, कथा, दान आणि भगवान सूर्यदेवाची आराधना या सर्व गोष्टींना विशेष महत्व दिले जाते. तसेच तिळ, गूळ आणि मिठाई या दिवशी वाटल्या जातात. तसेच मकर संक्रांतीला अनेक जण पतंदग देखील उडवतात.

मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकिंना सुगडयाचे वाण देतात या वाणात ऊस, मटर, हरभरे, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगडयात भरून हे वाण महिला वर्ग ज्यापध्दतीने एकमेकिंना देतं त्याचप्रमाणे पंढरपुरच्या रूक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया आजच्यादिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करतांना दिसुन येतात.मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याची, एकमेकांना देण्याची देखील प्रथा आहे.

“तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असं म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं कां!
तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या मौसमात आपल्या शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तिळगुळ पुर्ण करते आणि याच मुख्य कारणामुळे मकरसंक्रांतीला तिळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी.

मकरसंक्रांत आणि पतंग
सुवासिनी या दिवसांमध्ये हळदीकुंकवाचे आयोजन करतात हे तर समजले पण बालगोपाळांचे काय ? तर मंडळी बालगोपाळ तल्लीन असतात आपल्या मोठया भावाबरोबर, मित्रमंडळींबरोबर वडीलधाऱ्या माणसांसोबत पंतग उडविण्यात.भरपुर ठिकाणी पंतग मोहोत्सव देखील आयोजित केल्या जातो. पतंग बनविण्याचे देखील शिकविण्यात येते.

पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहाण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरात ला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते.

या पतंग उडविण्याचे शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्याला सहज लक्षात येईल की थंडीच्या या दिवसांमध्ये सुर्याच्या सान्निध्यात वेळ घालवण्याकरता पतंगी पेक्षा चांगले कारण कोणतेही असु शकत नाही. आणि म्हणुनच मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची परंपरा सुरू झाली असावी.

बोरन्हाण (लुट) आणि तिळवण

वयाच्या पाच वर्षांपर्यंत लहान मुलामुलींना या मकरसंक्रांतीच्या काळात बोरन्हाण घालण्याची परंपरा फार पुर्वीपासुन सुरू असल्याचे आपल्याला दिसते लहाल मुलांना काळे कपडे घालुन, हलव्याचे दागीने घालुन सजवतात आणि हरभरे, उसाचे तुकडे, मुरमुरे, बोरं, हलवा, याचे मिश्रण त्यांच्या डोक्यावर टाकतात. आधुनिक काळात चाॅकलेट, बिस्कीटे, लहानांचे आवडते जिन्नस देखील त्यांच्या डोक्यावरून टाकले जातात.

नवे लग्न झालेल्या नववधुचे हळदीकुंकु या दिवसांमध्ये पहिल्यांदा मोठया प्रमाणात हौसेने करतांना आपण पाहातो याकरता तीच्यासाठी काळी साडी, हलव्याचे दागिने (नव्या नवरदेवाला देखील हलव्याचे दागीने घालतात) विविध आभुषणं घालुन तिला सजविले जाते.

कोणताही सण आपल्याला आनंद, उत्साह, नवचैतन्य, देण्याकरताच येत असतो. रोजच्या दैनंदिन आयुष्यातल्या घडामोडींपासुन चार क्षण निवांत काढुन आपण देखील सणाचा हा अंगिकारतो त्यात रममाण होतो, भेटीगाठी होतात आणि या सण उत्सवापासुन मिळालेली उर्जा पुढे कित्येक दिवस आपल्याला रोजच्या दिनक्रमात जगण्याकरता उपयोगाला येते! आणि म्हणुन आपण प्रत्येक सण उत्साहाने जगावयास हवा .

Share