५ वर्षीय मुलाचा गळा आवळून आईचीही आत्महत्या

जळगाव : आपल्या पाच वर्षीय मुलाचा गळा आवळून स्वतः घराच्या वरच्या मजल्यावर दोरीने गळफास घेऊन एका ३२ वर्षीय विवाहितेने आपल्या माहेरी आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. अमळनेर तालुक्यातील शिरूड येथे ही घटना घडली. या दुहेरी आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

शिरूड (ता. अमळनेर) येथील वसंत बळीराम पाटील यांची मुलगी पूर्वी यांचे शिक्षण एम. एस्सी. झाले होते. त्यांचा २०१५ मध्ये नंदुरबार येथील दीपक सोनवणे-पाटील यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना ऋषांत नावाचा पाच वर्षांचा मुलगा आहे. पूर्वी या मुलगा ऋषांतसोबत दोन वर्षांपासून आपल्या माहेरी वडिलांकडे शिरुड येथे राहत होत्या. ऋषांत हा दररोज आपल्या आजी-आजोबांसोबत झोपायचा. गुरुवारी (१६ जून) मात्र पूर्वी यांचे जेवण झाल्यानंतर त्या ऋषांतला वरच्या खोलीत आपल्यासोबत झोपायला घेऊन गेल्या.

दररोज सकाळी ऋषांत लवकरच उठत असल्याने आज तो का उठला नाही म्हणून त्याची आजी त्याला पाहण्यासाठी वरच्या खोलीत गेली असता, तो पलंगावर मृतावस्थेत आढळून आला, तर पूर्वी यांनी छताच्या लोखंडी कडीला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतलेला होता. मयत ऋषांतचा गळा दोरीने आवळल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

पूर्वी यांनी लिहिलेली एक चिठ्ठीदेखील खोलीत पोलिसांना आढळून आली. या चिठ्ठीत त्यांनी माझ्या मृत्यूला कोणालाही दोषी धरू नये, असे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेबाबत पोलिस पाटील विश्‍वास महाजन यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत अमळनेर पोलिस ठाण्यात पूर्वी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे व कर्मचारी कैलास शिंदे तपास करीत आहेत.

Share