अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा; गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्यात औरंगाबादनंतर आणखी एका शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी पत्रात म्हटलं आहे की, नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा-पुतण्याच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॅामब्लास्टचा सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत आर्थिक भागीदार नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरदचंद्र पवार यांना हिंदू राजमाता यांची जयंती म्हणजे नातवाला लॅान्च करण्याचा इव्हेंट वाटतो, असंही पडळकरांनी म्हटलं आहे.

तसेच हिंदूराजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर म्हणजे संपूर्ण हिंदूस्थानाच्या प्रेरणास्थान आहेत. जेंव्हा हिंदूस्थान मुसलमानी राजवटीत हिंदूसंस्कृती,मंदिरं लुटली आणि तोडली जात होती, त्यावेळेस अहिल्यामातेनं या हिंदुसंस्कृतीत प्राण फुकले, त्यांचा जीर्णोद्धार केला. हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला, त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यानगर’ करण्यात यावे अशी तमाम अहिल्याप्रेमींची लोकभावना आहे, असं पडळकरांनी पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान आपण आता कोणत्या इतिहासाचा वारसा सांगणार आहात? मुघलशाही की होळकरशाहीचा? ‘अहिल्यानगर’ नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल ही अपेक्षा, अन्यथा हा बहुजन जागा झालाय आणि संघटीत झालाय, हे लक्षात ठेवा, असं त्यांनी म्हटलं आहे.

Share